राहुरी विद्यापीठ : ‘विकेल ते पिकेल’ याचा उपयोग करुन लोकांचा कल कुठल्या बाजुने आहे याचा विचार कृषी संशोधनात होणे गरजेचे आहे.विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर ब्रिडर बियाणे तयार केल्यास बियाणे संशोधन करणाऱ्या संस्थांना फायदा होईल.शहरी लोकांच्या आरोग्याविषयक जागरूकता वाढली असुन त्याचा मोठा फायदा सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होईल.म्हणुन भविष्यातील बाजारपेठेचा विचार करता नैसर्गिक शेती उपयुक्त ठरणार असल्याचा सल्ला नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठात ‘मागोवा-2021’ या आयोजित कार्यक्रमात उदघाटनपर भाषणात विभागीय आयुक्त गमे प्रमुख
पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,पद्मश्री तथा आदर्शगाव योजनेचे
कार्याध्यक्ष पोपटराव पवार,बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे,अन्नमाता ममताबाई भांगरे,विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख,अधिष्ठाता (कृषि)
डॉ.प्रमोद रसाळ,कुलसचिव डॉ.दिलीप पवार,नियंत्रक सुखदेव बलमे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुुले कृषि
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते.
यावेळी कुलगुरु डॉ.पाटील म्हणाले की,महात्मा फुले कृषि विद्यापीठातुन पदवी घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रात अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.मिळालेल्या ज्ञानाचे रुपांतर प्रात्यक्षिकात उतरविणारे हे खरे मॉडेल असल्याचे गौरवोद्गार काढत उत्कृष्ट पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा व कृषि उद्योजकांचा प्रत्येक महिन्यात पोस्टरद्वारे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्रसिध्दी देवून त्यांचा सन्मान करण्याची प्रथा विद्यापीठात सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतीतील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव विद्यापीठ संशोधनात व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे योगदान बियाणे उद्योग,अन्न तंत्रज्ञान,मशीनरी उद्योग,प्रशासन या सारख्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले. यावेळी पद्मश्री पवार व पोपेरे यांनीही मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यापीठाच्या वतीने
पवार व पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा श्रीफळ,सन्मानपत्र,मानचिन्ह,शाल देवून सत्कार
करण्यात आला.सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल ममताताई भांगरे यांचाही
सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यापीठाच्या ‘कृषिदर्शनी 2022’ व ‘कृषि दिनदर्शिका-2022’ चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक
डॉ.शरद गडाख यांनी केले.अधिष्ठाता (कृषि) डॉ.रसाळ यांनी शैक्षणिक,कुलसचिव डॉ.दिलीप
पवार यांनी प्रशासकीय,सुखदेव बलमे यांनी वित्त विभागाचा तर मिलिंद ढोके यांनी विकास
कामांचा आढावा घेतला.
याप्रसंगी सर्व सहयोगी अधिष्ठाता डॉ.श्रीमंत
रणपिसे,डॉ.मिलिंद अहिरे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
डॉ.आनंद सोळंके यांनी तर आभार डॉ.पंडित खर्डे यांनी मानले.कोव्हीड-19 चे नियम पाळून फक्त
50 अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.या
कार्यक्रमात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध जिल्हयातील अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.
0 टिप्पण्या