Ad Code

'शाळा प्रवेशपुर्व तयारी उपक्रमा'च्या पहिल्याच दिवशी बोधेगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिलीत ५६ विद्यार्थ्यांचा प्रवेश


शेवगाव :  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या असलेल्या बोधेगाव (ता.शेवगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकुण प्रवेशपात्र १०६ पैकी तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी 'शाळा प्रवेशपुर्व तयारी अभियाना'च्या पहिल्याच दिवशी आपला प्रवेश निश्चित केला आहे. भविष्यात देखील गुणवत्तेच्या बाबतीत शाळेचा आलेख कायम चढता ठेऊ असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ लबडे यांनी दिला.

इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांचा प्रवेश अर्ज भरून घेताना शिक्षिका.


हेही वाचा  -  संभाषण कौशल्य काळाची गरज

अंगणवाडीतुन इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा आपली वाटावी,त्यांच्या मनात शाळेविषयी कुठलीही भीती वाटु नये या उद्देशाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक व पालकांच्या मदतीने ‘शाळा पूर्व तयारी अभियाना' राबविण्यात आले.यावर्षी प्रथमतःच जुन महिन्यांऐवजी एप्रिल महिन्यात शाळेत दाखल करून घेण्यात आले.शाळेत प्रथमच पाऊल टाकणाऱ्या या चिमुकल्यांचे गुलाबपुष्प देऊन शालेय व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ व शिक्षकांनी स्वागत केले.यावेळी सरपंच सुभाष पवळे,माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत घोरतळे, राधाकिशन घोरतळे,शामद शेख,काकासाहेब मिसाळ,मयुर हुंडेकरी,पत्रकार प्रा.रामेश्वर तांबे,ग्रामविकास अधिकारी जाधवर भाऊसाहेब,मुख्याध्यापक रघुनाथ लबडे उपस्थित होते.

शाळा पुर्व तयारी अभियानांच्या पार्श्वभूमीवर शाळेतील महिला शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती.

हेही वाचा  -  'उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी, बारामतीच्या दारी'

गेल्या काही वर्षापासुन कोरोनामुळे शाळा बंद होत्या.मध्यंतरी शाळा सुरू झाल्या मात्र अंगणवाडीतील शिक्षण मात्र अद्यापही बंदअवस्थेत आहे.येत्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणारी मुले अंगणवाडीमध्ये गेलेली नाहीत.शाळेविषयी गंध नसलेली ही मुले थेट पहिलीत प्रवेशित होत आहेत.त्यांना शाळेविषयी आस्था वाटावी आणि मनात कुठलीही भीती न येता शालेय परिसर आपला वाटून विद्यार्थी शाळेत रमला पाहिजे यांमुळे हा उपक्रम महत्वाचा असल्याचे मुख्याध्यापक लबडे यांनी सांगितले.

चित्रांच्या मदतीने अक्षर ओळख करून देताना शिक्षिका.


मराठी माध्यमातुन शिक्षण घेतले तर जीवनात उच्च ध्येय गाठता येते.अशा जिल्हा परिषद शाळेतुन शिक्षण घेतलेली कित्येक मुले आज प्रशासकीय पातळीवर कार्यरत आहेत.या शाळेतील शिक्षक गुणवान असल्याने भविष्यात राज्यात विद्यार्थी,शिक्षक व गावाचा नावलौकिक होईल असे गौरवोद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य काकडे यांनी काढले.मुख्याध्यापकांनी येथील मुलांना शाळेत पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र टाकी व इतर सुविधा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणुन देत ही गैरसोय टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करताच उप सरपंच नितीन काकडे यांनी ग्रामपंचायतीमार्फत चिमुकल्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शंभर टक्के करू असे आश्वासन दिले.

पहिलीत प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या आपल्या बांधवांसाठी शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी अंक,अक्षर ओळख बाबतची आकर्षक शालेय साहित्यांची निर्मिती केल्याचे पहावयास मिळाले.

यावेळी उपसरपंच नितीन काकडे,पत्रकार प्रा.रामेश्वर तांबे यांचेही मनोगते झाली.उपशिक्षक कल्पना बटुळे,मंगल निकम,अंबादास पालवे,महेश कराड,संतोष राठोड, संगीता बडे,मेनका ढाकणे,अरुण पठाडे,वर्षा झिरपे,संदीप बडे,अंजली चव्हाण,जयश्री राठोड,श्रीकांत पालवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक चंद्रशेखर पाटील यांनी तर आभार उपशिक्षक किरण बैरागी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu